समाजात राहणाऱ्या प्रत्येकाची, कुटुंबाची व अगदी समाजाची गोष्टही वेगळी असते. त्यातही शहरी व ग्रामीण भागातील परिस्थिती भिन्न असल्याने त्यांची कथाही वेगळी असते. अशा २१ कथांचा गुच्छ सुधा सहस्रबुद्धे यांनी ‘वाट संघर्षाची’ या पुस्तकातून सादर केला आहे. कथांमध्ये कधी ग्रामीण, तर कधी शहरी वातावरण दिसले, तरी याचा समान धागा समाजाविषयीच्या कळकळीचा आहे. प्रेमकथा, कुटुंबकथांच्या परिघाबाहेर जाऊन व्यक्त केलेली सामाजिक वेदना यातून दिसते. काही कथांमध्ये या वेदनेवर फुंकर घालण्याचा उपाय शोधलेला दिसतो. ग्रामीण भागात महिलांना घोटभर पाण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, हातावर पोट असणाऱ्यांना पावसामुळे करावे लागणारे दिव्य, निःस्वार्थ सेवेत आप्तस्वकीयांनी अडथळे निर्माण केल्यावर ‘संघर्षाच्या वाटेवर’ चालून ठाम निर्णय घेणारी गोदावरी, मानवतेच्या दृष्टिकोनातून परक्या व पोरत्या बाळाचा ‘स्वीकार’ करणारी माता, शेतकरी व जवान पुत्राची समाजाकडून होणारी उपेक्षा, व्यथा मांडणारी वीरमाता अशी माणसांची विविध रूपे यातून दिसतात.
पुस्तक : वाट संघर्षाची
लेखिका : सुधा सहस्रबुद्धे
प्रकाशन : नीहारा प्रकाशन
पृष्ठे : १६०
मूल्य : २०० रुपये
(‘वाट संघर्षाची’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)